माती ला जपा...... मिलिंद जि गोदे
नमस्कार मंडळी
जगात तंत्रज्ञानविषयक बदल विलक्षण वेगाने होत असल्याने अनेक मानसिक व सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या मते सध्याच्या जगात राहणे सुखाचे उरलेले नाही. काही औद्योगिक देशांत दर दहा वर्षांनी आर्थिक मंदीची लाट दुप्पट होत चालली आहे. अमेरिकेत मोटार अपघात, खून या खालोखाल मृत्युंच्या कारणात आत्महत्यांचा तिसरा क्रमांक लागतो. व्यक्तीव्यक्तीमधील दुरावा, सामाजिक वेगळेपणाची भावना, असुरक्षितता, भविष्याबद्दल अनिश्चितता, आणि सततची सामाजिक वंचना यामुळे धार्मिक मूलतत्ववाद सर्वत्र बोकाळत चालला आहे. बहुसंख्य लोकांच्या जीवनामध्ये साचेबंदपणा निर्माण झाला आहे.,
आपल्या देशात एवढी सुपीक जमीन, विपुल पाणी आणि मुबलक सूर्यप्रकाश असूनही आपल्या देशातील कोट्यवधी जनतेला कमालीच्या दारिद्रयात, रोगराईत व अज्ञानात जीवन कंठावे लागत आहे. त्यातून मुक्त व्हायचे असेल तर विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. त्याचबरोबर आपली नैसर्गिक वैशिष्ट्ये जपली पाहिजेत. सहिष्णुता, अनुकंपा व सुविचारांपासून आर्थिक संपन्नता व्यर्थ आहे. उपभोक्तावादावर व चंगळवादी प्रवृत्तींवर संयमाने मात केली पाहिजे. अन्यथा पृथ्वीमातेच्या पोटातील सर्व खनिजे समाप्त होतील. प्रदूषणाने मानवी जीवन संपुष्टात येईल. पृथ्वी एक ओसाड ग्रह ठरेल. या दृष्टीने माती, पाणी, सूर्यप्रकाश, सुपिकता, हवा, जीवजंतू, पर्यावरण याचा साकल्याने विचार करावा लागणार आहे.
कृषि उत्पादनाचे खरे भांडवल मातीची सुपीकता हेच आहे. ह्यूमस हा त्यातील
परवलीचा शब्द आहे. त्याचप्रमाणे वाफसा स्थिती, मोकळी हवा, सूक्ष्म जिवांचे कार्य
हेही या पध्दतीचा आत्मा आहे. या पैदा केलेल्या अन्नाचा संबंध मानवीआरोग्याशी असल्याने जमिनीच्या सुपिकतेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
शेतीला औद्योगिक जगाचे नियम लावणे चुकीचे आहे. शेतीला ती परिमाणे कधीच लावता
येणार नाहीत. आज शेतीक्षेत्रामध्ये अनेक प्रकारे माहिती जमवली जाते. गणिती पध्दतीने,सांख्यिक पध्दतीने तिचे विश्लेषण केले जाते. परंतु या सर्व प्रयत्नांना तसा काहीच अर्थ नसतो.
अनेक तज्ञ व विषय यामध्ये शेती विषय विभागला गेला असल्यामुळे समस्यांची सोडवणूक होत नाही. अनेक तज्ञांच्या पाठीमागे धावून शेतकरी गोंधळून गेला आहे. सात आंधळे व एक हत्ती
अशी परिस्थिती शेती संशोधनामध्ये निर्माण झाली आहे.
शहरातील माणसांना आणि सामान्यजनांना वाटते तशी शेतकऱ्यांची जमीन केवळ निर्जीव माती नाही. ती एक सजीव सृष्टी आहे. तिचा जिवंतपणा ज्याला समजेल, तोच तिला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करील. तिला योग्य प्रमाणात अन्न-पाणी हवा मिळण्याची सोय करील. या गोष्टी समजावून घेऊन जो शेती करतो, तो उत्कृष्ट शेतकरी नोय. याउलट सावकार जसा जळूसारखा आपल्या ऋणकोचे रक्त पीत रहातो, तसेच काही शेतकरी अधाशीपणे जमिनीच्या आरोग्याकडे
दुर्लक्ष करून अधिकाधिक उत्पादनाच्या मागे लागतात. असे शेतकरी वाईट शेतकरी होत जाणता शेतकरी आपल्या मुला-बाळांचे, जनावरांचे, पाळीव पक्ष्यांचे संरक्षण आणि जोपासणा करणे जसे महत्त्वाचे समजतो, त्याचप्रमाणे जमिनीकडेही लक्ष देतो.
सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पती फक्त जिवंत नाहीत, तर त्यांना प्राण्यांसारख्या भावना असतात हे सिध्द केले. त्याआधी कित्येक शतके शास्त्रज्ञ, ऋषींनी या जिवंत, चैतन्यपूर्ण, भावनापूर्ण वनस्पतीसृष्टीचा मूलस्रोत कुठला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 'माती' हा घटक जीवसृष्टीचे मूळ आहे हे सिध्द केले. मातीबरोबरच, पाणी, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांनी सृष्टी निर्माण झाली हे सिध्द केले. याच जमिनीतून सूक्ष्म जीवजंतू, कीटक विविध वनस्पती आणि लहानमोठे प्राणी यांची अखंड व समग्र जीवनशृंखला विकसित झाली आहे. नियतीने एक स्वयंचलित, स्वयंपूर्ण व्यवस्था उभारलेली आहे. सहजीवन, सहअस्तित्व, परिपूर्णता व परस्पर पूरकता या तत्वावर त्याची उभारणी झालेली आहे.
सारी जीवसृष्टी जमिनीपासून पोषण घेत असते. उपजाऊ, सुपीक जमिनीच्या आश्रयानेच मानवाच्या वसाहती वसल्या. पावसाळ्यात नद्यांतून रक्तवर्णीय पाणी वहात असते. धरणीमातेचे ते रक्तमांसच होय. भारतात दरवर्षी ६०० कोटी टन उपजाऊ माती समुद्रात वाहून जाते. सुपिकता, उपजाऊ शक्ती वाढवणे हा आपल्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. सेंद्रिय शेतीपध्दतीचे, खतपध्दतीचे जनक सर अल्बर्ट हावार्ड यांच्या मताप्रमाणे, 'मातीतील जिवाणूंना पुष्ठ करून फलप्राप्ती करणे अधिक लाभदायक ठरते. आपला परिसर, आपले पर्यावरण, आपली जमीन, आपले पाणी यांचा संयमित वापर करून आपण सुखसमृध्दीत राहू या...
धन्यवाद...
मिलिंद जि गोदे
Mission agriculture information
Save the soil all together
milindgode111@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा